Saturday, September 18, 2021

पंचायती-७

ग्रामसेवक ग्रामपंचायतीचा फक्त सचिव नसतो तर तो problem solver असतो. ग्रामपंचायतमध्ये रोज एक नवी समस्या,प्रश्न,अडचण त्याच्यासमोर येत असते; आणि ती सोडवण्याचा प्रयत्न ग्रामसेवक करत असतो. त्यात त्याचे कौशल्य पणाला लागत असते. कालांतराने त्याला या सर्वांची इतकी सवय होते की, एखाद्या दिवशी काही प्रॉब्लेम आला नाही तर त्याला चुकल्या-चुकल्या सारखे वाटते. ग्रामसेवकाची नोकरी संथ पाण्यात चालणारी नाव नसते. तुफान समुद्रात हेलकावे खात चालणारे ते एक जहाज असते.
© राजेश खाकरे
#पंचायती  दि.१८ सप्टेंबर २०२१

Thursday, January 21, 2021

ग्रामसेवकांच्या आत्महत्या: चिंतेचा विषय

ग्रामसेवकांच्या आत्महत्या: चिंतेचा विषय

कामाचा प्रचंड बोजा, रोज रोज नवीन योजना व आदेश,
कामकाजाच्या नियमात सुस्पष्टता नसणे,
ग्रामपंचायत पातळीवरील द्वेषाचे राजकारण,
खोट्या व सूडबुद्धीने केलेल्या तक्रारी,
वरिष्ठांचा मानसिक व आर्थिक त्रास, निरर्थक चौकशा, दडपशाही
ह्या कारणांमुळे ग्रामसेवक संवर्ग तणावात असून राज्यभरात ग्रामसेवक आत्महत्या प्रकरणे वाढली आहेत.

उपाययोजना:
खालीलप्रमाणे काही उपाययोजना करून ग्रामसेवकांवरील कामाचा ताण काही प्रमाणात कमी केला जाऊ शकतो:

◆ एक गाव एक ग्रामसेवक:- आज एका ग्रामसेवकाकडे दोन ते तीन ग्रामपंचायतीचा पदभार आहे. इतके सगळे कामकाज प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये करतांना ग्रामसेवकांच्या नाकी नऊ येतात.

◆ कामे व योजना ठरवून देणे व तेवढीच कामे करणे आवश्यक (आज उठ सूट काही आले तरी ग्रामसेवक कडे सोपवले जाते)

◆ ग्रामसभा कायमस्वरूपी बंद : ग्रामसभेचा उद्देश कितीही चांगला असला तरी मात्र लोकांनी ग्रामसभेचा दुरुपयोग केला आहे. एकमेकांचे उणेंदूने काढणे, गोंधळ घालणे, भांडण तंटे करणे, यासाठीच ग्रामसभेचा उपयोग विरोधक करत आहेत. शासकीय योजनांची माहिती मिळण्यासाठी आज अनेक समाजमाध्यमे उपलब्ध आहे. त्यामुळे ग्रामसभा हा प्रकार कालबाह्य झाला आहे. विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी कुणीही ग्रामसभेला येत नाही मात्र वादाचा मुद्दा असला की लोक ग्रामसभेत नक्की गोंधळ घालणार.

◆ वैयक्तीक लाभाच्या सर्व योजनांसाठी कृषि विभागाप्रमाणे ऑनलाइन onetime अर्जप्रणाली तयार करणे व जिल्हा, तालुका स्तरावर लाभार्थी निश्चित करणे.

◆ 7/12 प्रमाणे शासनाने नमुना नं 8 व 9 साठी एक स्वतंत्र वेबसाईट तयार करणे, व ऑनलाइन करवसुली प्रणाली विकसित करणे- (उदा. एकावेळी किमान 25% कर भरल्याशिवाय नमुना 8 उतारा डाउनलोड न होणे ) 

◆ MGNREGA साठी स्वतंत्र यंत्रणा तयार करणे

◆ गाव पातळीवर शासनामार्फत एक कुटूंबनिहाय सर्वेक्षण करणे ज्यामध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे, सर्व माहिती, जसे आधारकार्ड, बँक खाते क्रमांक, राशन कार्ड, शौचालय सुविधा, जमीन, विहीर, जात, इत्यादी माहितीचा database तयार करणे, सदारील माहिती एका वेबसाईटवर अपलोड करून login द्वारे विविध विभागांना वापरता येईल अशी व्यवस्था करणे. दर पाच वर्षानी ही माहिती सर्वेक्षण द्वारे update करणे.

◆ योजनांचे एकत्रीकरण करणे: आज योजनांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे विनाकारण कामकाज, मिटींग, अहवाल, आराखडे यामध्ये वाढ झाली आहे, त्यामुळे समान उद्दिष्टे असणाऱ्या योजनांचे एकत्रीकरण करणे आवश्यक आहे. ज्यामुळे योजना राबविण्यात सुटसुटीतपणा येईल.

◆ आत्महत्येस कारणीभूत व्यक्ती, अधिकारी यांच्यावर कडक कार्यवाही होणे आवश्यक आहे. ज्यामुळे जाणूनबुजून त्रास देणाऱ्यास जरब बसेल.

◆ ग्रामसेवक हा एक व्यक्ती आहे, माणूस आहे त्यामुळे एक माणूस एकावेळी किती कामे करू शकेल याचा विचार करूनच त्याच्याकडे कामे सोपविणे आवश्यक आहे.

यासारख्या उपाययोजना शासनाने राबविण्यासाठी संघटनेने शासकीय पातळीवर पाठपुरावा करणे गरजेचे आहे.
- राजेश खाकरे
मो.7875438494

Thursday, October 15, 2020

पंचायती-६

गावातील ८०% लोकांना ग्रामपंचायतीशी काहीही देणेघेणे नसते. त्यांना कुठला कागद लागलाच तर ते एखाद्यावेळी ग्रामपंचायतला येतील अन घेऊन जातील. ते त्यांच्या स्वतःच्या कामात गुंतलेले असतात. ते कुणाच्या अध्यामध्यात पडत नाही. १०% लोक ग्रामपंचायत बॉडीचे सदस्य आणि त्यांचे समर्थक असतात. तर उरलेले १०% लोक विरोधक. सगळा गोंधळ, राजकारण, चढाओढ, हेवेदावे ह्या २०% लोकांमध्येच चालू असतात. ह्या २०% मधील लोकच आलटून पालटून सरपंचाच्या खुर्चीवर बसतात. कामाच्या तक्रारी करतात,चौकशा लावतात, अर्ज-फाटे करतात. आणि गंमत अशी की ह्या सगळ्या गोष्टीचा डायरेक्ट त्रास ग्रामसेवकाला होतो.
© राजेश खाकरे
#पंचायती  दिनांक १५ ऑक्टोबर २०२०

पंचायती-५

एखाद्या कायद्याचा उद्देश कितीही चांगला असला तरी त्यातील कलमांचा गैरफायदा घेणारे महाभाग कमी नाहीत. माहितीचा अधिकार कायदा त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. नागरिकांना शासकीय कार्यालयाकडून आवश्यक माहिती सहजपणे मिळावी हा या कायद्याचा उद्देश! मात्र काही समाजकंटक ढिगाने अर्ज अनेक कार्यालयांना करून फक्त शासकीय कार्यालयांचा वेळच वाया घालवीत नाहीत तर, प्रसंगी कर्मचाऱ्यांना ब्लॅकमेलिंगही करतात. आपली चुकीची कामे करून घेण्यासाठी माहितीच्या अधिकारात अर्ज करण्याच्या धमक्या देतात. असे लोकच लोकहिताच्या कायद्याचे खरे शत्रू आहेत!
© राजेश खाकरे
#पंचायती  दिनांक १५ ऑक्टोबर २०२०

Monday, October 12, 2020

पंचायती-४

केवळ पंचायत समिती पातळीवर अतिरिक्त गटविकास अधिकारी नेमून ग्रामपातळीवर विविध योजनेच्या अंमलबजावणीमध्ये गती येणार नाही; तर जिथे प्रत्यक्ष अंमलबजावणी होते त्या ग्रामपंचायत स्तरावर "एक ग्रामपंचायत एक ग्रामसेवक", आणि त्यानंतर अतिरिक्त ग्रामसेवक नेमणूक झाली,तरच खऱ्या अर्थाने योजना प्रभावीपणे राबविल्या जाऊ शकतात. दोन हातांनी पन्नास कामे एकाचवेळी करण्याची अपेक्षा ठेवली तर 'एक ना धड भाराभर चिंध्या' अशीच गत होणार!
© राजेश खाकरे
#पंचायती  दि.१२ ऑक्टोबर २०२०

Saturday, October 10, 2020

पंचायती-०३

ग्रामपंचायत ही गावपातळीवरील सर्वात महत्वाची स्थानिक स्वराज्य संस्था आहे. पंचायत राज पद्धतीत जेवढे महत्व जिल्हा परिषद, पंचायत समिती, यांना आहे तेवढेच महत्व ग्रामपंचायतींना आहे. किंबहुना प्रत्यक्ष जनतेपर्यंत योजना पोहचवणारी व अंमलबजावणी करणारी यंत्रणा ग्रामपंचायत आहे. ग्रामसेवक हा या स्थानिक स्वराज्य संस्थेचा एकमेव मुख्य सचिव आहे. म्हणून ग्रामपंचायत जर अधिक सक्षम करायची असेल तर ग्रामसेवकाला सक्षम करावे लागेल. ग्रामसेवकांवरील कामाचा बोजा, अधिकार आणि त्याच्या वेतनत्रुटी बघता ग्रामपंचायत सक्षम होण्यास अजून बराच कालावधी जावा लागणार हे निश्चित आहे!
© राजेश खाकरे
#पंचायती - १० ऑक्टोबर २०२०

Friday, October 9, 2020

पंचायती-०२

आज काल प्रत्येक विभाग गावपातळीवर त्यांच्या विभागाच्या  कर्मचाऱ्यांवर कामाची जबाबदारी सोपविण्याऐवजी ती जबाबदारी ग्रामसेवकांवर सोपवत आहे; यामुळे ग्रामसेवकांवर आज कामाचा ताण वाढत असला तरी,त्या त्या विभागाच्या गावपातळीवरील कर्मचाऱ्यांसाठी ती धोक्याची घंटा आहे. कारण काही वर्षांनी त्यांनी पदे निरुपयोगी ठरवून बंद होण्याची शक्यता आहे. माणसाला आधी शेपटी होती. तिचा वापर बंद झाल्याने ती गळून पडली. ज्या गोष्टी वापरल्या जात नाही त्या बंद होतात असे विज्ञान सांगते.
© राजेश खाकरे
#पंचायती

पंचायती-०१

ग्रामपंचायत अशी गोष्ट आहे, तिथे जगावेगळ्या समस्या निर्माण होतात. ज्याचा अंदाज नियम कायदे बनवणाराला पण नसेल, नियम आणि वस्तुस्थिती याची सांगड घालण्यासाठी 'ग्रामसेवक' म्हणून जन्म व्हावा लागतो!😃
© राजेश खाकरे
#पंचायती

Sunday, February 10, 2019

ग्रामसेवकांचे राशिभविष्य

🕺🏻 *ग्रामसेवकांचे राशी भविष्य*- © राजेश खाकरे
➖➖➖➖➖➖➖➖➖
        🌞 *_SUNDAY SPECIAL_*🌞
➖➖➖➖➖➖➖➖➖
तुम्ही महाराष्ट्रातील कुठल्याही जिल्ह्यात आणि तालुक्यातील कोणत्याही ग्रामपंचायतीमध्ये काम करत असा, हे तुमचे राशिभविष्य तुम्हांला अचूक लागू पडेल.

■ *मेष:* 🐏

'अति घाई संकटात नेई' याचा परिचय तुम्हांला या महिन्यात येणार आहे. किर्द लिहितांना डोके शांत ठेवा. पाच-दहा रुपयाचा हिशोब न जुळल्याने काहीसा मनस्ताप संभवतो. बँक व हात शिल्लक यामुळे डोकेदुखी वाढत गेल्याचे लक्षात आल्याने हात शिल्लक न ठेवणेच हिताचे राहील. रेकॉर्ड अपडेट करण्यासाठी वेळीच वेळ काढणे हितावह राहील. मासिकसभा,ग्रामसभा प्रोसीडींग वेळीच पूर्ण केल्याने कामात उत्साह येईल.

■ *वृषभ:*🐂

'एक ना धड भाराभर चिंध्या' असा काहीसा अनुभव तुम्हाला येणार आहे. पीएमएवाय,रमाई योजना,  शबरीयोजना,पाणीटंचाई, पांधणरस्ते, १४ वा वित्त आयोग, ,दलीतवस्ती योजना,एमआरईजीएस, स्वच्छ भारत मिशन,जलयुक्त शिवार, आणि यांसारख्या आणखी पाचपन्नास योजना आणि बैठका या कामामुळे डोके काहीसे सुन्न पडल्यासारखे वाटेल. कोठून आपण इथे येऊन पडलो असेही वाटून जाईल. मात्र मनोधैर्य जतन करण्याचा हा महिना आहे.हळूहळू सवय झाल्याने अंगात अवसान येईल. प्रत्येक विषय "टॉप प्रयोरिटी"चा असल्याचा जप वरिष्ठ अधिकारी मीटिंगमध्ये करतील, तो लक्ष देऊन ऐकावा.

■ *मिथुन:* 💑

'तंत्रज्ञान आल्याने काम सोपे होईल' हा भ्रम मनातून अजिबात काढुन टाकावा.माहिती सादर करताना सॉफ्ट आणि हार्ड अशा दोन्हीही कॉप्या सादर कराव्या लागणार आहे,याचे भान ठेऊन वाटचाल करावी. प्रियासॉफ्ट व इतर 11 सॉफ्टवेअर, ईग्रामसॉफ्ट, प्लॅनप्लस, 1 ते 33 नमुने,  आवाससॉफ्ट,एमआवाससॉफ्ट, ही सर्व माहिती अतिशय सॉफ्ट मनाने भरावी. संगणक ऑपरेटरने टाळाटाळ केल्यास ते तंत्रज्ञान स्वतः आत्मसात करावे किंवा प्रसंगी पदरमोड करून नेटकॅफे गाठून कामे वेळेत पार पाडावी. आपला जिल्हा प्रत्येक कामात ऑनलाइनला एक नंबरला दिसेल याची सर्वस्वी जबाबदारी आपलीच आहे, हे लक्षात ठेवून वाटचाल करणे हिताचे राहील.

■ *कर्क:* 🦀

"उसातून जावे मात्र पाचट अंगाला लागू देऊ नये" हा मंत्र लक्षात ठेवणे तुमच्यासाठी महत्वाचे ठरणार आहे.तुमची एखादी तक्रार आली म्हणजे वरिष्ठ अधिकारी तुमच्याकडे लगेच संशयाने बघतील. तुम्ही गावात यापूर्वी कितीही चांगली कामे केलेली असली किंवा तुम्ही अगदी तुमच्या कामाला प्राधान्य देऊन जीव तोडून कामे करत असला तरी 15 रुपये देऊन टाईप केलेला एक अर्जाचा कागद तुम्हांला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करण्यास, तुमची चौकशी करण्यास, तुम्हाला कारणे दाखवा नोटीस निघण्यास, तुम्ही अगदीच कामचुकार ठरण्यास पुरेसा आहे,ही जाणीव मनोमन ठेवावी.

■ *सिंह:* 🦁

काम नियमाने करावे अशी तुमची इच्छा जरी असली तरी नियमाला आणि प्रसंगी तुम्हांलाही धाब्यावर बसवून काम करवून घेणारे तुमच्याकडे येतील, अशा प्रसंगी डगमगून न जाता शांत राहून तुमचे ज्ञान पूर्वानुभव याचा सुयोग्य वापर करून असा प्रश्न सोडविणे हिताचे राहील. ज्याचे काम तुम्ही केले त्याच्यासाठी 'साहेब चांगले' आणि न झाल्यास 'साहेब खराब' हे दोन शिक्के तयारच असणार आहेत.त्याचा फारसा विचार न करता आपल्या कामावरच पूर्ण लक्ष केंद्रित करावे.

■ *कन्या:* 👩🏻‍🌾

"झाले बुवा एकदाचे काम पूर्ण" असा नुसता म्हणायचा अवकाश की दुसरे काम तुमच्या मोबाईलच्या whatsapp पडद्यावर दत्त म्हणून उभे असणार.त्यामुळे आता एक दोन दिवस फारशी कामे नाहीत असे दिवस सध्या तरी तुमच्या भाग्यात नाहीत. उलट दुसऱ्या किंवा चौथ्या शनिवारी रविवारी कुठे फिरायला जाण्याचे आखलेले बेत शुक्रवारी आलेल्या साहेबांच्या मॅसेजमुळे/ईमेलमुळे रद्द करावे लागण्याचीच जास्त शक्यता आहे. त्यामुळे "भीक नको कुत्रं आवर" अशीच तुमची मानसिकता या महिन्याच्या उत्तरार्धात होणार आहेत.

■ *तूळ:* ♈

एकाच गावात खूप दिवस झाल्यामुळे "अतिपरिचयात अवज्ञा" याचा काहीसा अनुभव आल्याने वरचेवर गाव बदलण्याबाबत तुमच्या मनात विचार डोकावून जातील. मात्र त्यासोबत तुम्ही गावासाठी केलेल्या धडपडीचे चीज गावात झालेल्या सकारात्मक कामातून दिसून आल्याने एक समाधानही तुमच्या चेहऱ्यावर झळकून जाईल.त्यावेळी तुमच्या मनोवृत्तीवरचा मळभ काही क्षण दूर होऊन तुम्हाला स्वतःलाच तुमच्या कार्याचा आणि पदाचा अभिमान वाटून जाईल. त्यात तुम्हांला झालेला सर्व त्रास,अडचणी वाहून जाईल आणि मन हलकेहलके वाटेल.

■ *वृश्चिक:* 🦂

एखाद्याचे काम न केल्यामुळे किंवा सत्ताधारी पार्टीच्या विरोधकांचे एखादे काम नियमात न बसल्यामुळे "ग्रामसेवक गावात येत नाही" किंवा तत्सम तक्रारींचा त्रास काहीसा जाणवेल. मात्र ती धग काहीशी कमी करायची असल्यास गावात गेल्यावर मुद्दाम सार्वजनिक लोकवस्तीच्या ठिकाणी जाऊन पाच दहा जणांना राम राम करून यावा. एखाद्या गल्लीतून कामाशिवाय चक्कर मारून यावी. यामुळे बराच फरक पडल्याचे जाणवेल.

■ *धनु:* 🏹

नोकरीत बढती मिळेल अशी आशा अजिबात करू नये, कारण ग्रामविकास अधिकारी झाले तरी तुमच्या पगारात दोनचारशे रुपयांपेक्षा जास्त फरक पडत नाही,तसेच सहाव्या वेतन आयोगात तुमच्यावर झालेला अन्याय पुढे सातव्या वेतन आयोगातही चालू राहील, याची कायम आठवण ठेवावी. कारण ग्रामसेवक हे गावपातळीवरील अत्यंत विश्वासू पद आहे असे शासनास फक्त कामे सोपवताना वाटते.. शाबासकी आणि शिक्षा या दोन्ही गोष्टी कामाच्या प्रेरकतेसाठी आवश्यक असतात; मात्र तुम्ही केलेल्या चांगल्या कामाला शाबासकी मिळण्याची हमी नसली तरी एखाद्या छोट्याशाही चुकीची मोठी शिक्षा मिळू शकते,याची जाणीव मात्र ठेवावी. तुम्हांला शाबासकी देऊन कुणीही प्रेरणा देणार नाही, त्यामुळे आपण स्वतः स्वयंप्रेरीत राहणेच श्रेयस्कर आहे.

■ *मकर:* 🐎

तुमचा अधिकारी तोपर्यंत तुमच्या सोबत आहे जोपर्यंत तुम्ही कुठल्या अडचणीत सापडलेले नाही. त्यानंतर मात्र तुम्ही तसे का केले हे विचारायला ते मोकळे असतात. त्यामुळे कार्यालयीन आणि लिखित आदेशच पाळावेत,याची जाणीव तुम्हांस होईल. उगीच भावनात्मक होऊन किंवा जास्तीचा विश्वास ठेवणे महागात पडू शकते. असे असले तरी काही अधिकाऱ्याकडून तुम्हांला सुखद अनुभवसुद्धा येऊ शकतो, मात्र असे अनुभव आणि अधिकारी अपवादात्मक असतात हे तुम्हांला कालानुरूप लक्षात येईल.

■ *कुंभ:*⚱

तुम्ही नोकरी करत असला तरी नोकरीतल्या चढउताराने फारसे विचलित होऊ नका.कारण तुमच्याकडे इतक्या गोष्टी आहेत की, एखादी गोष्टही तुम्हांला कचाट्यात पकडायला पुरेशी आहे. त्यामुळे नोकरी बरोबरच तुमचे कुटुंब, प्रेमाची माणसे, मित्रपरिवार यांनाही वेळ द्या.सुट्टीच्या दिवशी कुठे फिरायला जा. एखादा छंद जोपासा, एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी वेळ घालवा, सकारात्मक सामाजिक कामासाठी काही वेळ आणि पैसा खर्च करा. तुम्ही पोट भरण्यासाठी नोकरी करत असला तरी तुमच्या माध्यमातून अनेक लोकांची जीवने कळत नकळत सुखी होत असतात, तो ही आनंद घ्या. काम मन लावून करा, चांगले करा, तुम्हाला अधिक चांगला अनुभव येईल.

■ *मीन:*🐋

"पाण्यातला मासा झोप घेतो कैसा,जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे" ग्रामसेवकाच्या वेदना ग्रामसेवक झाल्याशिवाय कळणार नाहीत हेच खरे, त्यामुळे उगीच आपल्या जखमा इतरांना दाखवून उपयोग नाही . आपल्या जखमांवर आपणच इलाज करायला शिकायला हवे, त्यासाठी संघर्ष करायला हवे, संघटित रहायला हवे, अभ्यास करायला हवा, प्रसंगी नकार देता यायला हवे, ठाम राहता यायला हवे, आणि फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतूनही उंच भरारी घेता यायला हवी. प्रश्न असतील तर उत्तरे असतील. ग्रामसेवक असेल तर त्याच्यासमोर आव्हाने असतील.आव्हाने पेलण्यासाठीच आपला जन्म झालेला आहे, हे ही विसरून चालणार नाही. शेवटी गरिबांचे अश्रू पुसण्याचे भाग्य आपल्यापेक्षा जास्त कुणाला मिळालेले नाही, ही जाणीव सुखद अनुभव देणारी आहे.
© *ज्योतिषाचार्य राजेश खाकरे*
मो.७८७५४३८४९४


(माझी ही पोस्ट तुम्ही माझ्या नावासह इतर ग्रुपवर फॉरवर्ड करू शकता)

Wednesday, October 10, 2018

सरपंच थेट निवड

सरपंच थेट निवड

निकालाचा आनंद अजून सदाशिवरावांच्या चेहऱ्यावरून झळकतच होता. आज दुपारीच ग्रामपंचायत इलेक्शनचा निकाल जाहीर झाला होता. जनतेतून थेट निवडणुकीतून सरपंच म्हणून सदाशिवराव निवडून आले होते.यावेळी पहिल्यांदाज जनतेतून थेट सरपंच निवड झालेली असल्याने निवडणुकीचे आणि राजकीय समीकरणं बऱ्यापैकी बदलून गेलेले होते. सदाशिवराव आपल्या खुर्चीत बसून मागील 15-20 दिवसांच्या घटनाक्रमाबद्दल विचार करत होते. आज ते सरपंच झाले होते. खरं तर ते खूप खुश होते.मात्र क्षणभर त्यांचा या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता. सुनीताताई सदाशिवरावांच्या सुविद्य पत्नी, हातात चहा घेऊन त्यांच्याकडे बघत होत्या. तिकडे सदाशिवरावांचे लक्षच नव्हते.
"अहो, सरपंचसाहेब, चहा घ्या..!" सुनीताताईंच्या या आवाजाने ते थोडेसे दचकलेच.! भानावर येऊन हसत हसत म्हणाले,
"आता हे काय नवीन..!"
"अहो नवीन म्हणजे काय, तुम्ही आता सरपंच झालात न्हवं..आता सवय केली पाहिजे!" हसत हसत सुनीताताई बोलल्या आणि दोघेही खळखळून हसले. दोघांच्याही चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता.
"अहो, एक ईचारू का..?" सुनीताताईने कुतूहलाने विचारले.
"काय.?"
"ते निकाल लागल्यावर 10-15 दिवस सगळ्या सदस्याला घेऊन कुठे टूरला जावे लागत असते, ते आता उद्या जाणार का..?" सुनीताताईंनी पृच्छा केली.
"अगं,कसली टूर म्हणते तू..?
"ते नाही का मागच्या वेळी ते गणपतराव सरपंच झालते तव्हा, ते सर्व 15 दिवस सगळ्या निवडून आलेल्या सदस्याला घेऊन कुठेतरी कुणाला माहीत नाही अशा ठिकाणी घेऊन गेलते म्हणे, गंगू सांगत होती की, त्यांना कुठल्या चांगल्या हॉटेलात जेवणखाण, राहणं ते सगळं करावं लागतं असं.." सुनीताताईने जरा सविस्तर सांगितले.
सदाशिवराव गालातल्या गालात हसले, आणि म्हणाले,
"तीच तर खरी मेख आहे आता..!"
सुनीताताईची काहीशी न समजल्यासारखी मुद्रा बघून सदाशिवराव म्हणाले,
"अगं, हे बघ पहिल्यांदा काय असायचं कि, निकाल लागला कि ज्याला सरपंच व्हायचं त्याला सगळ्या सदस्याला सांभाळीत बसावं लागायचं अन आत्ता..."
"अहो सरपंच.....!!!" बाहेरून आलेल्या या भारदार आवाजाने सदाशिवरावांचं बोलणं अर्धवट राहिलं आणि सदाशिवरावांनी आवाजाच्या दिशेनं बघितलं.
आवाजापाठोपाठ काही मंडळी आत आली. त्यांच्या हातात एक फुलांची मोठी माळा होती. सुनीताताईने बघितले, ते सर्वजण आज निवडून आलेले सदस्य होते. त्यांनी सोबत आणलेली फुलांची माळ सदाशिवरावांना  घातली. गुलाल उधळला, त्याचवेळी बाहेर फटाक्यांची आतिषबाजी झाली. सदाशिवरावाने सुनीताताईकडे बघून स्मितहास्य केले.सुनीताताईला थोड्या वेळापूर्वी सदाशिवरावांच्या अर्धवट राहिलेल्या वाक्याचा अर्थ समजून गेला. त्यांनाही हसू आवरले नाही.
"सदाशिवराव तुम आगे बढो... हम तुम्हारे साथ है" अशा घोषणांनी परिसर कितीतरी वेळ दणाणून गेला होता.
©राजेश खाकरे
औरंगाबाद
मो.७८७५४३८४९४
rajesh.khakre@gmail.com

(पूर्वप्रकाशीत १०/०९/२०१७)

Thursday, October 4, 2018

लेडीज सरपंच म्हणजे तीन सरपंच

लेडीज सरपंच म्हणजे तीन सरपंच
ती,तिचा पती आणि तिचा मुलगा
--© राजेश खाकरे

७३ वी घटनादुरुस्ती झाली आणि स्रियांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कारभारात हक्काचे स्थान प्राप्त झाले. स्रियांना स्थानिक स्वराज्य संस्था यामध्ये स्वतः सहभागी होऊन, निर्णय प्रक्रियेत भाग घेऊन कारभार करण्याची संधी घटनेने दिली.
ग्रामपंचायत ही गावपातळीवरील स्थानिक स्वराज्य संस्था. स्रियांना पूर्वी ३३% आणि आता ५०% आरक्षित जागा झाल्यामुळे गावच्या विकासात स्रिया महत्वाची भूमिका पार पाडतील अशी आशा या निमित्ताने निर्माण झालेली होती. सर्वसाधारणपणे पुरुषाहून स्रिया बऱ्याच गोष्टी अधिक छान रीतीने करू शकतात. हे सर्वांच्या अनुभवाचे आहे. ५०% स्रिया गावच्या ग्रामपंचायतीत निवडून आल्यामुळे गावचे चित्र चांगल्यापैकी बदलेल, गावाच्या विकासात अधिक हातभार लागेल असे वाटत असताना प्रत्यक्षात मात्र वेगळीच परिस्थिती निर्माण झाली.
निवडणुकीचा फॉर्म भरताना "या इथे सही कर/अंगठा कर" ही परिस्थिती ग्रामपंचायतीचा संपूर्ण ५ वर्षाचा कार्यकाळ संपेपर्यंत कायम असते. ज्या ठिकाणी स्त्री सरपंच आहे, तिथे एक सरपंच नसतोच, तिथे एकूण ३ सरपंच असतात. ती, तिचा पती आणि तिचा मुलगा. स्त्री सरपंच झाल्यावर ती तिचे निर्णय घेऊ शकेल. गावचा कारभार पाहू शकेल, हा विश्वास तिच्या घरच्या लोकांनाच नसतो तिथे गावातल्या इतर लोकांचे काय सांगणार. ती सरपंच झालीय ना. तिचे तिला बघूद्या, घेऊ द्या, निर्णय, तिचेही काही स्वतःचे विचार असतील, गावाचा विकास करण्याच्या कल्पना असतील, राबवू द्या तिला, सुरवातीला काही चुका होतील, मात्र विश्वास तर टाकायला हवाच ना..! हे मात्र कुठेच घडून येत नाही.
ती सरपंच तर बनते मात्र सर्व सूत्रे तिच्या हातात कधीच नसतात. केवळ जागा राखीव आहे आणि माणूस त्या ठिकाणी फॉर्म भरून सरपंच होऊ शकत नाही, म्हणून तो त्याच्या पत्नीला त्या जागी उभा करतो. आणि ती सरपंचपदी निवडून येते मात्र प्रत्यक्षातला अघोषित सरपंच तिचा पतीच बनतो. तो जे सांगेल तसंच ती बोलणार, तो जिथे सही कर म्हणेल तिथे ती सही करणार, तिच्या मताला, म्हणण्याला, निर्णयाला काहीच महत्व उरत नाही.
आम्ही भारतीय नियमाला आमच्या पद्धतीने वाकवत असतो. नियमाने म्हणाल तर ती सर्व प्रक्रिया पुऱ्या करते, ती सभेची अध्यक्ष असते, ती झेंडा फडकवते, पण ती सूत्रधार नसते. सूत्रे हलवणारा कधी तिचा पती असतो, कधी मुलगा असतो, कधी सासराही असतो.
स्रियांना ५०% जागा राखीव आहेत, त्यांना बरोबरीचे स्थान देतो असा गवगवा आम्ही सर्वजण मोठ्या आवाजात करत असतो, मात्र वास्तव याहून फार वेगळे आहे. किती सरपंचपदावर असणाऱ्या स्रियांना स्वतः निर्णय घेण्यास तिचे घरचे लोक परवानगी देतात. ही टक्केवारी काढली तर खुपच कमी आहे.
या सर्वात मोठी गोची होते ते ग्रामपंचायतीचे सचिव ग्रामसेवकांची. कारण अशा ठिकाणी त्याला ऑर्डर देणारे तीन जण असतात. आणि बऱ्याचवेळा त्या तिघांच्या सांगण्यात सुद्धा विरोधाभास असतो. नियमानुसार सरपंच काय सांगतील ते ग्रामसेवकाला ऐकायचे असते. सरपंच निर्णय घेण्यासाठी तिच्या पती किंवा मुलावर अवलंबून असते. समन्वय राहावा म्हणून ग्रामसेवक समायोजन करून त्यांच्याशीही चर्चा करत असतात. यामध्ये ग्रामसेवकाचा उद्देश ग्रामपंचायतीचे कामकाज सुरळीत चालावे हा उद्देश असतो. उदाहरण द्यावयाचे झाल्यास एखाद्या तातडीच्या मुद्द्यावर सरपंच यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करून काही माहिती वरिष्ठ कार्यालयास द्यावयाची असते, अशावेळी मोबाईल हा सरपंच यांच्या पतिकडे असतो, आणि मुख्य निर्णय सरपंच पतीच घेतात हे ग्रामसेवकाला माहीत असल्याने तो त्यांच्याशी चर्चा करून माहिती देतो. नंतर ती बाब जर अंगलट येण्याची शक्यता दिसली की सरपंच पती लगेच हात वर करतात, कायदेशीर दृष्ट्या त्यांना जबाबदार धरता येत नाही. आणि मला हा विषय सांगितलाच नाही, माहीतच नाही, त्यांनी परस्पर तसे केले असे महिला सरपंच म्हणू शकते.म्हणून ग्रामसेवक त्यामध्ये नाहक बळी ठरतो. हे फक्त एक उदाहरण झाले. अशी अनेक उदाहरणे घडत असतात. नियम आणि वास्तव याचा मेळ घालताघालता  ग्रामसेवकाची उगीच गोची होते.
सरपंच,उपसरपंच किंवा सदस्य यांच्या नातेवाईकांने ग्रामपंचायतीच्या कामकाजात हस्तक्षेप करू नये असे शासनाचे परिपत्रकही आहे, मात्र त्याची अंमलबजावणी व्यावहारिक दृष्ट्या आणि गावपातळीवरील सरपंच, उपसरपंच किंवा सदस्यांच्या नातेवाईकांच्या मानसिकतेच्या दृष्टीने कितपत उपयुक्त होते हे सर्वानाच माहिती आहे.
"स्त्री निर्णय घेण्यास सक्षम नाही, तिने माझेच ऐकायला हवे, मी सांगेन तसेच होईल, तू जरी पदावर असली तरी काय करायचे ते मीच ठरवीन" ही पुरुषाची मानसिकता हे सर्व घडण्यामागे कारणीभूत आहे. एखादी स्त्री सरपंच झाल्यावर तिचा पती, मुलगा किंवा तिच्या घरातला कुठलाही पुरुष तिला तिचे काम पूर्णपणे स्वतंत्रपणे करू देतोय, तो तिच्या पदाच्या जबाबदारीत अजिबात ढवळाढवळ करत नाही, तो त्याच्या वैयक्तिक कामासाठी ग्रामपंचायतीमध्ये जरी गेला तरी तो फक्त गावाचा नागरिक म्हणून जातो, असे चित्र किती ग्रामपंचायतीमध्ये असेल? आणि तसे चित्र कुठे असेल तर तेच खऱ्या अर्थाने स्रियांची सत्तेतली भागीदारी आहे. मात्र तसे ज्या दिवशी सर्वत्र घडून येईल ती  "दृष्टीकोन दुरुस्ती" असेल. तसे झाले तर स्रिया त्यांचे खरे योगदान गाव विकासात देऊ शकतील. तो खऱ्या अर्थाने सुदिन असेल.
© राजेश खाकरे
मो.७८७५४३८४९४
www.rajeshkhakre.blogspot.in

पंचायती-७

ग्रामसेवक ग्रामपंचायतीचा फक्त सचिव नसतो तर तो problem solver असतो. ग्रामपंचायतमध्ये रोज एक नवी समस्या,प्रश्न,अडचण त्याच्यासमोर येत असते; आणि...